राजकारणात येण्यापेक्षा माझ्या मुलांनी भीक मागितलेली आवडेल, असे सोनिया गांधी कधी म्हणाल्या होत्या?

Partly False राजकीय | Political

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांचे एक रंजक वक्तव्य सोशल मीडियावर पसरत आहे. एका जुन्या बातमीच्या कात्रणामध्ये सोनिया गांधी यांनी त्यांच्या मुलांनी राजकारणात येण्यापेक्षा भीक मागितली तरी आवडेल असे म्हटल्याचे दिसते. दावा केला जात आहे की, सोनिया गांधी यांनी 1999 साली असे वक्तव्य केले होते. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

फेसबुकवर वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण शेयर करण्यात येत आहे. “मेरे बच्चे भीख मांग लेंगे, पर राजनीति में नहीं आएंगे: सोनिया” असे बातमीचे शीर्षक आहे. पोस्टकर्त्याने सोबत लिहिले की, सोनिया गांधी असे 1999 साली म्हणाल्या होत्या.

screenshot-www.facebook.com-2020.01.01-19_16_54.png

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकवरील

तथ्य पडताळणी

यासंदर्भात शोध घेतला तेव्हा एनडीटीव्ही इंडिया वेबसाईटवर 19 जून 2018 रोजीचे वृत्त दिसून आले. ज्याचे शीर्षक आहे: ‘जब सोनिया गांधी ने कहा – मेरे बच्चे सड़कों पर भीख मांग लेंगे लेकिन राजनीति में नहीं आएंगे’

यामध्ये ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंह यांच्या ‘दरबार’ पुस्तकाच्या हवाल्याने म्हटले की, सत्तरच्या दशकात आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता. त्यांच्या जागी जनता पक्षाचे सरकार आले. याच काळात एके दिवशी राजीव गांधी आणि सोनिया गांधी एका पार्टीहून परतत होते. त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार तलवीन सिंह यादेखील होत्या. गप्पांच्या ओघात तवलीन यांनी सोनिया गांधी यांना त्यांच्या मुलांनी राजकारण आलेले आवडेल का? असे विचारले. यावर क्षणभर विचार करून सोनिया गांधी यांनी उत्तर दिले होते की, “राजकारणात येण्यापेक्षा माझ्या मुलांनी भीक मागितली तरी चालेले.”

screenshot-khabar.ndtv.com-2020.01.01-19_34_01.png

मूळ बातमी येथे वाचा – एनडीटीव्ही इंडिया ।  अर्काइव्ह

तवलीन सिंह यांचे राजीव व सोनिया गांधी यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांनी 2012 साली ‘दरबार’ हे पुस्तक लिहिले होते. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात राजधानीमध्ये सत्ताकेंद्रांमध्ये कसे राजकारण चालते याचे अनेक किस्से या पुस्तकात आहेत. त्यावेळी सोनिया गांधी यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. किंबाहुना राजीव व सोनिया दोघेही राजकारणापासून दूर होते, असे तवलीन यांनी लिहिलेले आहे. 

अशा काळात तवलीन यांनी सोनिया गांधी मुलांच्य राजकीय प्रवेशाविषयीचे मत विचारले होते. त्यावर सोनिया गांधी यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती.

या पुस्तकातील संबंधित उताऱ्याचा स्क्रीनशॉट (सौजन्य : गुरुप्रसाद पोर्टल) खाली दिला आहे. गुगल बुक्सवरदेखील हा उतारा असल्याचे फॅक्ट क्रेसेंडोने पडताळून पाहिले. तसेच इंडिया टुडे वेबसाईटवर या पुस्तकाच्या समीक्षेतदेखील सोनिया गांधी यांच्या या वक्तव्याचा उल्लेख आहे.

मूळ पुस्तक येथे पाहा – गुगल बुक्सगुरुप्रसाद पोर्टल

आणीबाणी उठल्यानंतर 22 जुन 1977 रोजी जनता पक्षाचे सरकार आले होते. हे सरकार 1980 साली कोसळले होते. म्हणजे या दरम्यान सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केले असावे. अधिक शोध घेतला असता रुपा व्यंकटेश लिखित ‘सोनिया गांधी: द पॉवर – पार्ट 1’ (2016) पुस्तकातील एक उतारा आढळला. 

यानुसार, संजय गांधी यांचे 1980 साली निधन झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी म्हणून राजीव गांधी यांना राजकारणात उतरावे लागले. राजीव यांच्या या निर्णायाला सोनिया गांधी यांचा विरोध होता. “त्याने (राजीव गांधी की मुलं?) राजकारणी होण्यापेक्षा माझ्या मुलांनी दिल्लीच्या रस्त्यांवर भीक मागितली तरी मला चालेल” असे सोनिया गांधी त्यावेळी म्हटल्याची ऑस्ट्रेलियन पत्रकार व फार इस्टर्न इकोनॉमिक रिव्ह्युचे संपादक हमिश मॅकडॉनल्ड यांनी नोंद केली होती.

मूळ पुस्तक येथे वाचा – गुगल बुक्स

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, मुलांनी राजकारणात उतरण्यापेक्षा भीक मागितली तरी चांगले, अशा आशयाचे वक्तव्य सोनिया गांधी यांनी आणीबाणी व राजीव गांधी यांच्या राजकीय प्रवेशादरम्यान (1977-80) केले होते. ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंह यांनी ‘दरबार’ (2012) पुस्तकात हे वाक्य दिले आहे. तसेच त्यांनी मुले राजकारणात कधीच येणार नाहीत, असे म्हटले नव्हते. मुलांनी राजकारणात आलेले त्यांनी आवडणार नाही, असेच त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे सोनिया गांधी 1999 साली असे म्हणाल्या हा दावा चूक आहे.

Avatar

Title:राजकारणात येण्यापेक्षा माझ्या मुलांनी भीक मागितलेली आवडेल, असे सोनिया गांधी कधी म्हणाल्या होत्या?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: Partly False