
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील युवक केवळ हिंदूस्थानलाच नाही तर देशालाही बदलू शकतात, असे वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांची बुध्दीमत्ता पाहा, असा दावा करत सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राहुल गांधींनी खरोखर असे वक्तव्य केले होते का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
राहुल गांधींनी खरोखर असे वक्तव्य केले असल्यास ते कोठे आणि कधी केले, असा प्रश्न आम्हाला पडला. हा व्हिडिओ नीट पाहिला असता त्यावर युवा आक्रोश रॅली 28 जानेवारी असे लिहिले असल्याचे आम्हाला दिसून आले. आपण ते खाली पाहू शकता.
त्यानंतर आम्ही युवा आक्रोश रॅली असा शब्दप्रयोग करत शोध घेतला. त्यावेळी 28 जानेवारी 2020 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत युटुयुबवर वाहिनीवर अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आम्हाला दिसून आला. राहुल गांधी यांनी जयपूर येथील युवा आक्रोश रॅलीत केलेले हे भाषण आहे. या भाषणात 2 मिनिटे 34 सेकंदाला ते म्हणाले, युवक केवळ हिंदूस्थानलाच नाही तर देशालाही बदलू शकतात पण त्यानंतर त्यांना आपली लक्षात येताच त्यांनी माफी मागितली आणि जगाला बदलू शकतात, असे म्हटले आहे.
यातून स्पष्ट होते की, दिशाभुल करण्यासाठी राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे. समाजमाध्यमात पसरणारा व्हिडिओचा भाग आणि मूळ व्हिडिओतील भाग याची तुलना आम्ही खाली केली आहे.
निष्कर्ष
राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग दिशाभुल करण्यासाठी समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्याकडून चूक होताच त्यांनी तात्काळ माफी मागत भारतातील युवक देशालाच नव्हे तर जगालाही बदलू शकतात, असे म्हटलेले आहे.

Title:राहुल गांधी यांचे अर्धवट वक्तव्य समाजमाध्यमात व्हायरल, वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: Partly False
