
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून माघार घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त दैनिक प्रहारने दिले आहे. आंबेडकर यांना अकोल्यातून मागच्या पराभवासारखी भीती वाटत आहे. त्यामुळे अकोला मतदारसंघातून माघार घेऊन सोलापूर मतदारसंघावर ते लक्ष केंद्रित करण्याची शक्यता असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या वृत्ताची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
महाराष्ट्र टुडे या संकेतस्थळाने प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून माघार घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त दिले आहे. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि अकोला मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर अकोल्यातून उमेदवारी मागे घेऊ शकतात, असे बोलले जात आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
द एशियन एजने 28 मार्च 2019 रोजी एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार ते अकोला आणि सोलापूर येथे निवडणुक लढविणार आहेत. आपण या दोन्ही जागांवरुन माघार घेणार नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.
डेलीहंटनेही याबाबतचे वृत्त दिले असून प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून माघार घेणार नसल्याचे या वृत्तातुन स्पष्ट करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांच्याशी फॅक्ट क्रिसेंडोने संपर्क साधला असता त्यांनी या दोन्ही जागांवरुन प्रकाश आंबेडकर निवडणुक लढविणार आहेत. सोलापूर आणि अकोला या दोन्ही जागांवरुन ते माघार घेणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
निष्कर्ष
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन्ही जागांवरुन निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. माघार घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीनेही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Title:सत्य पडताळणी : प्रकाश आंबेडकर अकोल्यातून माघार घेण्याची शक्यता?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
