
देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच महाराष्ट्र सरकारने वाईन शॉप दुपारी 3 ते 4 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचा टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीचा एक स्क्रीनशॉट सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू असताना महाराष्ट्र सरकारने खरोखरच असा काही निर्णय घेतलाय का याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू असताना महाराष्ट्र सरकारने वाईन शॉप दुपारी 3 ते 4 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतलाय का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला न्यूज 18 लोकमतने 21 मार्च 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार कोरोनामुळे दारू, वाईन शॉप बंद राहणार असून आदेशांचं उल्लंघन कारवाई होणार आहे.
त्यानंतर दैनिक सकाळच्या संकेतस्थळाने 20 मार्च 2020 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसारही कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वाईन शॉप, सर्व प्रकारची दारुची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक सकाळच्या संकेतस्थळाने दिलेले वृत्त / Archive
हॅलो महाराष्ट्र या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहणार आहेत. खबरकट्टा या संकेतस्थळानेही काय सुरु राहणार याचे सविस्तर वृत्त दिले आहे. महाराष्ट्र सरकारने जीवनावश्यक वस्तूची केलेल्या व्याख्येत वाईनचा समावेश नसल्याचे दिसून येते. या वस्तूमध्ये 13 मार्च 2020 रोजी मास्क आणि हॅण्ड सॅनिटाझरचा समावेश करण्यात आला आहे. यातून हे स्पष्ट झाले की, वाईन शॉप सुरु ठेवण्याचा कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही.
निष्कर्ष
संचारबंदीच्या काळात वाईन शॉप सुरु ठेवण्याचा कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही.

Title:महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान वाईन शॉप उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
