
जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट जेवणाची पोलखोल केल्यामुळे बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आलेले तेज बहादुर यादव सध्या खूप चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वारणसी येथून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या तेज बहादुर यांच्या नावे सध्या पुलवामा हल्ल्यावरून भाजपविरोधी केलेले एक विधान सोशल मीडियावर पसरविले जात आहे. याची फॅक्ट क्रेसेंडोने पडताळणी केली.
फेसबुक पोस्टमध्ये तेजबहादुर यादव यांचा टीव्ही मुलाखत देतानाचा एक फोटो दिसतो. त्याखाली लिहिलेले आहे की, यदि पुलवामा कि सच्चाई सबके सामने आ जायेगी तो बीजेपी अपना 2 सीट भी नहीं बचा पोयेगी.
युजरने तेज बहादुर यांच्यावर निशाना साधत लिहिले की, काय निर्लज्ज माणूस आहे हा. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अजून त्या बिचाऱ्या शाहिद जवानांचा वापर करतोय. हिम्मत असेल तर केलेल्या कामांवर मत मागा ना.
मग तेज बहादुर यांनी खरंच असे विधान केले होते का?
तथ्य पडताळणी
पोस्टमध्ये दिलेल्या फोटोत NDTV असे लिहिलेला माईक दिसतो. त्यामुळे तेज बहादुर एनडीटीव्ही या चॅनेलला मुलाखत देत असतानाचा हा फोटो असावा. फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर खाली देलेला फोटो समोर आला.

हा फोटो आणि फेसबुक पोस्टमधील फोटो सारखेच आहेत. एनडीटीव्हीच्या युट्यूब अकाउंवर तुम्ही ही मुलाखत पाहू शकता. विशेष, म्हणजे ही मुलाखत 20 एप्रिल 2017 रोजीची आहे. म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ला (14 फेब्रुवारी 2018) होण्याच्या दहा महिने आधीची ही मुलाखत आहे. त्यामुळे यामध्ये तेज बहादुर पुलवामा हल्ल्याबद्दल काही बोलले नाही.
मग तेज बहादुर यांनी पुलवामाबद्दल काही विधान केले आहे का?
पुलवामा हल्ला झाल्यानंतर तेज बहादुर यांनी त्यांच्या फेसबुक अकांउंटवरून 17 फेब्रुवारी रोजी लाईव्ह व्हिडियोद्वारे केंद्र सरकारवर कडाडून टीका केली होती. सीआरपीएफ जवानांना शहीद असा दर्जा दिला जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्ती केली. त्याचबरोबर जवानांच्या संख्येतील कमतरता, जवानांना मंत्री-अधिकारी यांच्या घरी कामाला लावणे, गुप्तचर यंत्रणांचे अपयश यासह अनेक प्रश्नांवर त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले.
यामध्ये त्यांनी कुठेही पुलवामा हल्ल्याचे सत्य बाहेर आल्यावर भाजप दोन जागासुद्धा जिंकू शकणार नाही, असे म्हटलेले नाही. या बद्द्ल अधिक तुम्ही येथे वाचू शकता – बोलता हिंदुस्तान
तेज बहादुर यांच्या नावे यापूर्वीदेखील खोटे दावे पसरविण्यात आले आहेत. ते तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकता.
मोदींविरोधात लढणाऱ्या तेज बहादुर यादव यांच्या प्रचारासाठी खरंच येणार 10 हजार सैनिक?
निष्कर्ष
पुलवामा हल्ला होण्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीचा फोटो शेयर करून तेज बहादुर यांच्या नावे खोटे विधान पसरविले जात आहे. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे असली, तरी त्यांनी कधीही पुलवामा हल्ल्याचे सत्य बाहेर आल्यावर भाजपला दोन जागाही मिळणार नाही, असे वक्तव्य केलेले नाही.

Title:FAKE ALERT: माजी बीएसएफ जवान तेज बहादुर यादव यांच्या नावे खोटे विधान पसरविले जातेय.
Fact Check By: Mayur DeokarResult: False
