
भारत आणि चीनमधील संबंध बिघडल्यानंतर देशात चीनी वस्तू व कंपन्यांविरोधात जनप्रक्षोभ वाढत आहे. अशातच एक पोस्ट व्हायरल होत आहे की, भारत सरकारने टिकटॉक (TikTok) अॅपवर 25 जूनपासून बंदी घातली आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे निष्पण्ण झाले.
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये म्हटले की, भारत सरकारने अखेर निर्णय घेतला – 25 जून पासून भारतात टिकटॉक अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्ले-स्टोरमधून ते हटविण्यात येणार आहे.
हे खरं आहे का?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनी वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी जोर पकडत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच काही राजकीय नेत्यांनीदेखील चीनी वस्तूंविरोधात मत व्यक्त केले आहे.
मोबाईलमधून चीनी कंपन्यांचे अॅप्स काढून टाकण्याचे आवाहनदेखील केले जात आहे. परंतु, टिकटॉक या चीनी अॅपवर सरकारने बंदी घातल्याची कोणतीही बातमी आढळली नाही. भारत सरकारने जर असा निर्णय घेतला असता तर त्यासंबंधी नक्कीच बातमी झाली असती. पण तसे काहीच समोर आले नाही.
केंद्रीय पत्र व सूचना मंत्रालयाने (PIB) ट्विटरवर माहिती दिली की, चीनी मोबाईल अॅप्सला गुगल प्ले-स्टोरवर बंदी घालण्यात आल्याची ऑर्डर फिरत आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, ती ऑर्डर फेक आहे. सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
विविध वृत्तस्थळांनीदेखील सरकारच्या या खुलाशाबद्दल बातमी दिली आहे. इंडिया टुडेने म्हटले की, भारत सरकारने खुलासा केला की, टिकटॉक व इतर चीनी अॅप्सला गुगल प्ले-स्टोरवरून काढून टाकण्यास सांगितलेले नाही. तसा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.

मूळ बातमी येथे वाचा – इंडिया टुडे । अर्काइव्ह
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, भारत सरकारने 25 जूनापासून टिकटॉकवर बंदी घातलेली नाही. तो व्हायरल मेसेज खोटा आहे.

Title:भारत सरकारने 25 जूनपासून टिकटॉकवर बंदी घातली आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
