
बाजरी हे गरम धान्य असल्याने बाजरी व मेंढराचे मटण खाणाऱ्या व्यक्तीला सहसा कोरोना होत नाही. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि कोरोना होत नाही. बाजरीतील घटकांमुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. त्यामुळे रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यावरही काही होत नाही, असा दावा करणारा एक संदेश समाजमाध्यमात पसरत आहे. या संदेशाची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
काय आहे दावा?
बाजरी हे गरम धान्य असल्याने बाजरी व मेंढराचे मटण खाणाऱ्या व्यक्तीला कोरोना होत नाही.
Facebook | Archive | Facebook | Archive
तथ्य पडताळणी
बाजरी हे गरम धान्य असल्याने बाजरी व मेंढराचे मटण खाणाऱ्या व्यक्तीला सहसा कोरोना होत नाही, या दाव्यातील तथ्य शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळास भेट दिली. या ठिकाणी कोरोनाच्या काळात आहाराविषयी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीत कोठेही बाजरी, बाजरीची भाकरी अथवा मेंढराचे मटण कोरोनापासून तुमचे कोरोनापासून संरक्षण करते, असे म्हटल्याचे दिसून येत नाही. प्रक्रिया न केलेले अन्न खाण्याविषयी इथे सुचविण्यात आले आहे.
त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिशएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी बाजरी खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होत नाही. अँटी बॉडीज तयार होतात. हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. हेच मेंढराच्या मटणाबाबत असल्याबद्दलही त्यांनी सांगितले. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध नाही. लस येईपर्यंत स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निष्कर्ष
कोरोनाच्या काळात प्रकिया न केलेले अन्न खाण्याविषयी जागतिक आरोग्य संघटनेने सुचवले आहे. बाजरी आणि मेंढराचे मटण खाल्ल्याने कोरोना होत नाही हा दावा मात्र असत्य आहे.

Title:बाजरीची भाकर, मेंढराचे मटण खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होत नसल्याचा दावा चुकीचा; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
