
धारावी येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी “बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते, पूर्ण व्यवस्था नष्ट केली आहे” असे म्हटल्याचा दावा Prasad Deshpande यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एका व्हिडिओसह केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुकवरील मुळ पोस्ट / Archive
तथ्य पडताळणी
धारावीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी नेमके काय म्हटले होते. हे पाहण्यासाठी आम्ही युटूयूबवर त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओचा शोध घेतला. त्यावेळी आम्हाला त्यांच्या भाषणाचा खालील व्हिडिओ दिसून आला.
त्यांनी या संपूर्ण भाषणात भारतीय अर्थव्यवस्थेवर जोर दिल्याचे दिसून येते. भाषणाच्या सुरवातीलाच राहुल गांधींनी पंतप्रधानांनी 70 वर्षात काहीच झाले नाही, असे म्हटल्याचे सांगितले. जे नुकसान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ते काँग्रेस पक्षाने कधीही केले नाही, असे ते म्हणाले. या संपूर्ण भाषणात राहुल गांधींनी अनेक वेळा पॉज घेतल्याचेही आपण पाहू शकतो. भाजपचे लोक, नरेंद्र मोदी आणि फडणवीस हे अर्थव्यवस्थेची चर्चाच करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. चांद्रयान मोहिमेचे कौतुक करतानाच त्यांनी ISRO चे श्रेय काँग्रेस पक्षाला दिले. या मोहिमेने धारावीतील जनतेचे पोट भरु शकत नाही, असे ते म्हणाले. भाषणाच्या 5 मिनिटे 10 सेकंदापासून ते 10 मिनिटे 37 सेकंदापर्यंत प्रार्थना सुरु असल्याने ते थांबले असल्याचे आपण पाहू शकतो. 17 मिनिटे 48 सेकंदाला ते म्हणतात कोणतेही सरकार देशाला पुढे नेऊ इच्छित असेल, देशाची शक्ती वाढवू इच्छित असेल तर हे लोक आहेत ज्यांचे हात बांधलेले आहेत ते सोडवावे लागतील. त्यांचे हात नरेंद्र मोदींनी बांधलेले आहेत. त्यांना या हातकड्या तोडाव्या लागतील आणि मेड इन धारावी बनवावे लागेल. मेड इन धारावीच्या बळावरच मेड इन इंडिया बनवावे लागेल. तरच चीनशी मुकाबला होऊ शकेल. अन्य कोणताही मार्ग नाही. लाखो आणि कोट्यावधी रुपये रोज 15, 20 लोकांना देण्यात येतात याचा कोणताही फायदा नाही. हा पैसा हिंदूस्थानातील युवकांना आणि शेतकऱ्यांना दिल्यास मग पाहा काय होतंय. हिंदूस्थानात चमत्कार घडेल. हेच काम काँग्रेस पक्ष करेल. अन्य कोणीही हे काम करु शकत नाही. त्यानंतर त्यांनी
‘’Try कर लिया देख लिया 70 साल में कुछ नही हुआ, क्या हुआ. पुरा का पुरा सिस्टम नष्ट कर दिया. काँग्रेस पार्टी समझती है कैसे लोगो को लेकर एकसाथ देश चलाया जा सकता है,,
असे म्हटले आहे. या मराठी स्वैर अनुवाद खालीलप्रमाणे होऊ शकतो “ प्रयत्न केले 70 वर्षात काय नाही झाले, काय झाले. संपूर्ण यंत्रणा नष्ट करण्यात आली आहे. काँग्रेसला समजते की लोकांना एकत्र करत कसा देश चालवता येऊ शकतो,, आम्ही खोटे दावे करत नसल्याचेही त्यांनी पुढे म्हटले आहे. उलट्या-सुलटया गोष्टी आम्ही करत नसल्याचेही त्यांनी सांगितले. कारण आम्ही काम करणे जाणतो. 19 मिनिटे 27 सेकंदाला त्यांचे हे वाक्य पूर्ण होते. या संशोधनातून हे स्पष्ट होते की, “बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते, पूर्ण व्यवस्था नष्ट केली आहे” असे वाक्य त्यांनी म्हटलेले नाही. चुकीचे भाषांतर करत हा व्हिडिओ पसरविला जात आहे.
निष्कर्ष
धारावी येथील काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संपूर्ण भाषण ऐकल्यास त्यांनी कुठेही “बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते, पूर्ण व्यवस्था नष्ट केली आहे” असे म्हटल्याचे दिसून येत नाही. भाषणातील मागील, पुढील भाग न पाहता त्याचा संदर्भ न वापरता चुकीचे भाषांतर करुन भाषणातील काही भाग दाखवून हा व्हिडिओ चुकीच्या पध्दतीने पसरविला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : राहुल गांधी म्हणाले का, बघितले ना मागच्या सत्तर वर्षात काय वाट लावली ते
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
