
समाजमाध्यमात सध्या ईशान्य भारतातील म्हणून काही छायाचित्रे पसरत आहेत. ईशान्य भारतातील स्थिती भयावह असून तेथे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात येत असल्याचा दावा या छायाचित्रांद्वारे करण्यात येतो. ही छायाचित्रे खरोखरच ईशान्य भारतात सुरु असणाऱ्या हिंसाचाराची आहेत का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. जयसिंग मोहन यांनीही अशीच काही छायाचित्रे पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
ही छायाचित्रे एनआरसी आणि कॅब विधेयक लोकसभेत व राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आसाम किंवा बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराची आहेत का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही यातील पहिले छायाचित्र रिव्हर्स इमेजने शोधले.
फोटो क्र. 1
हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केल्यावर आम्हाला जो परिणाम मिळाला. त्यात अमर उजाला या हिंदी दैनिकाच्या संकेतस्थळावरील 22 मे 2018 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार एपी एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचे हे छायाचित्र आहे. द हिंदूनेही 21 मे 2018 रोजी हे छायाचित्र प्रसिध्द केले असून त्यात ग्वाल्हेरजवळ एपी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना लागलेल्या आगीचे हे छायाचित्र असल्याचे म्हटले आहे.
द हिंदूने दिलेले वृत्त छायाचित्रासह येथे पाहू शकता / Archive
फोटो क्र. 2
पहिले छायाचित्र हे 2018 मधील असल्याचे सिध्द झाल्यानंतर आम्ही आमचा तपास आणखी पुढे नेला. त्यानंतर आम्ही दुसरे छायाचित्र रिव्हर्स इमेजद्वारे शोधले. त्यावेळी हेलो App ची एक लिंक आम्हाला दिसून आली. या ठिकाणी अभी-अभी: छपरा, आनन्द विहार टरमिनल exp टकराई असे लिहिलेले आम्हाला दिसून आले. हा शब्दप्रयोग करत आम्ही शोध घेतला असता आम्ही मधेशा बेटा या पेजवर हे छायाचित्र 2 जुलै 2018 रोजी अपलोड केले असल्याचे आम्हाला दिसून आले. या सोबतच याठिकाणी ग्वाल्हेरच्या एपी एक्स्प्रेसच्या अपघाताचे छायाचित्र आम्हाला दिसले. एका वापरकर्त्याने हे एपी एक्स्प्रेसचेच छायाचित्र असल्याचे म्हटले आहे. हे छायाचित्रही सध्याचे नसून 2018 मधील असल्याचे यावरुन सिध्द होत आहे.
फोटो क्र. 3
त्यानंतर आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. तिसरे छायाचित्र आम्ही रिव्हर्स इमेजने शोधले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला. त्यात युक्रेनमधील टेलिग्राफ या संकेतस्थळावर 14 डिसेंबर 2019 रोजी हे छायाचित्र प्रसिध्द झाले असल्याचे आम्हाला दिसून आले. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात 5 मोकळ्या रेल्वेगाड्या पेटवून देण्यात आल्याचे एनडीटीव्हीच्या हवाल्याने या संकेतस्थळावर वृत्त देण्यात आले असून त्यात हे छायाचित्र वापरले आहे.
टेलिग्राफच्या संकेतस्थळावरील मुळ वृत्त / Archive
फोटो क्र. 4
त्यानंतर आम्हाला एक व्यक्ती रेल्वे डब्याची काच फोडत असल्याचे छायाचित्र आम्हाला दिसून आले. हे छायाचित्र आम्ही रिव्हर्स सर्च केले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला. त्यात इंडियन डिफेन्स न्यूज या संकेतस्थळावर 14 डिसेंबर 2019 रोजी याबाबतचा व्हिडिओ प्रसिध्द झाला असल्याचे दिसून आले. या वृत्तात कॅबविरोधात झालेल्या आंदोलनात रेल्वे गाडयाच्या काचा फोडण्यात आल्याचे म्हटले आहे.
फोटो क्र. 5
त्यानंतर आम्हाला अमर जवान स्मारकाचा अवमान करणारे एक छायाचित्र दिसले. हे छायाचित्र आम्ही रिव्हर्स इमेजने शोधले. त्यावेळी जो परिणाम मिळाला. त्यात आम्हाला एनडीटीव्हीच्या संकेतस्थळावरील 14 ऑगस्ट 2012 रोजीचे एक वृत्त दिसून आले. त्यात आझाद मैदानावरील दंगलीत या स्मारकाचा अवमान करण्याची घटना घडल्याचे म्हटले आहे. मिड-डेचे पत्रकार अतुल कांबळे यांनी हे छायाचित्र काढले होते. हे छायाचित्र सध्याचे नसून आसाम अथवा पश्चिम बंगालमधील नसल्याचे यातून स्पष्ट होते.
निष्कर्ष
कॅब आणि एनआरसी विरोधात निदर्शने करणाऱ्यांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्याची यातील 3 आणि 4 क्रमांकाचे छायाचित्र खरे तर अन्य छायाचित्रे जुन्या घटनांची आहेत. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य स्वरुपाची आढळली आहेत.

Title:Fact : आसाम, बंगालमधील म्हणून देशाच्या इतर भागातील जुन्या घटनांचे फोटो व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: Partly False
