
काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही कलम 370 पुन्हा लागू करणार…! – सुरजेवाला, अशी माहिती Anant Samant यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची पडताळणी केली आहे.
फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी
काँग्रेस सत्तेत आल्यास कलम 370 लागू करणार असे वक्तव्य काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही शोध घेतला. त्यावेळी मराठी माध्यमांमध्ये असे कोणतेही वक्तव्य प्रसिध्द झाल्याचे आम्हाला दिसून आले नाही. त्यानंतर आम्ही रणदीप सुरजेवाला यांच्या व्हेरिफाईड ट्विटर खात्यास भेट दिली. त्यावेळी त्यांचे असे कोणतेही वक्तव्य आम्हाला दिसून आले नाही. रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या www.surjewala.in या संकेतस्थळास आम्ही भेट दिली त्यावेळी त्यांनी असे कोणतेही वक्तव्य केल्याचे याठिकाणी आम्हाला दिसून आले नाही. युटूयूबवरही आम्ही रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत काय भूमिका घेतली आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी त्याचा खालील परिणाम प्राप्त झाला.
काँग्रेस पक्षाने या 9 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत याबाबत अशी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती. पक्षाने कलम 370 हटविण्यास आणि जम्मू -काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याच्या सरकारच्या निर्णयावरून सरकारला विरोध मात्र केलेला आहे. शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी पक्षाने याबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दैनिक लोकसत्ताने दिल्याचे आम्हाला दिसून आले.
काँग्रेसच्या राष्ट्रीय माध्यम समन्वयकांशी आम्ही याबाबत संपर्क केला असता त्यांनी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सांगितले.
निष्कर्ष
काँग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही कलम 370 लागू करणार, असे वक्तव्य काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केल्याचे कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : रणदीप सुरजेवाला असे म्हणाले का, काँग्रेस सत्तेत आल्यास कलम 370 पून्हा लागू करणार
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
