
रेल्वे प्रशासनाने डोंबिवलीला लोकलने जाणाऱ्या प्रवाशांना फक्त ठाण्यापर्यंतच बसता येईल, असे आदेश दिल्याचे वृत्त डोबिंवलीकर या फेसबुक पेजवरुन प्रसारित करण्यात येत आहे. कल्याण, कोपर, ठाकुर्ली, मुंब्रा, दिवा, ठाणे तसेच मुलुंडच्या प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या वृत्ताची तथ्य पडताळणी केली आहे. फेसबुकवर या वृत्ताला 272 लाईक्स असून 66 जणांनी हे वृत्त शेअर केले आहे. या वृत्तावर 57 जणांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तथ्य पडताळणी
या वृत्ताची सत्यता तपासण्यासाठी आम्ही मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दिली. या ठिकाणी आम्हाला अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही.
या वृत्ताची सत्यता तपासण्यासाठी आम्ही मध्य रेल्वेच्या फेसबुक पोस्टला भेट दिली. आम्हाला मध्य रेल्वेच्या फेसबुक पेजवर अशी कोणतीही पोस्ट आढळून आली नाही.
मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी व्ही. चंद्रशेखर यांच्याशीही आम्ही 022-22621576 या क्रमांकावर पोस्टची सत्यता पडताळण्यासाठी संपर्क साधला. त्यांनी रेल्वेने अशी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
निष्कर्ष
रेल्वेने कोणतीही घोषणा केलेली नसताना अशी पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी व्ही. चंद्रशेखर यांनीही ही पोस्ट असत्य असल्याचे स्पष्ट केले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Title:सत्य पडताळणी : डोबिंवलीकरांना लोकलमध्ये ठाण्यापर्यंतच बसण्याची मूभा?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
