
चीन आणि नेपाळ पाठोपाठ आता भूतानने भारताची चिंता वाढवली आहे. आसामचे शेतकरी भूतानमधील नदीच्या पाण्यावर शेती करत आहेत. हे पाणी आता भूतानने आता रोखले आहे, अशी माहिती सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. भूतानने खरोखरच भारतात आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
भूतानने भारतात आसाममध्ये येणारे पाणी खरंच रोखले आहे का? याचा शोध घेतला. त्यावेळी दैनिक नवाकाळच्या संकेतस्थळावरील 26 जून 2020 रोजीचे एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार भूतानने आसाममधील बकसा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पाणी रोखले आहे. आसामचे शेतकरी भूतानच्या या नदीतील पाण्यावर शेती करतात.

नवाकाळने दिलेले वृत्त / संग्रहित
त्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेचे 26 जून 2020 रोजीचे एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये भूतान सरकारने आसाममध्ये जाणारे पाणी अडविल्याचा इन्कार केला असल्याचे म्हटले असल्याचे दिसून आले.
भूतान सरकारने याबाबत काय म्हटलं आहे याचा शोध घेतला. त्यावेळी भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाची खालील पोस्ट दिसून आली. या पोस्टमध्ये भूतानने आसाममध्ये जात असलेले पाणी रोखलं असल्याचे खंडन केल्याचे दिसून येत आहे.
त्यानंतर आसामचे मुख्य सचिव कुमार संजय कृष्णा यांचे 25 जून 2020 रोजी रात्री उशिरा करण्यात आलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटनुसार नदीच्या पाण्याच्या प्रवाहात काही नैसर्गिक अडथळे निर्माण झाले असून ते दूर करण्यास भूतान भारताची मदत करत आहे. भूतानने आसामचे पाणी अडविल्याचे वृत्त चुकीचे आहे. हे ट्विट आपण खाली पाहू शकता.
निष्कर्ष
यातून हे स्पष्ट झाले की, भूतानने भारताचे पाणी अडविल्याची समाजमाध्यमातील माहिती असत्य आहे. भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि आसामच्या मुख्य सचिवांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

Title:भूतानने आसाममध्ये येणारे पाणी रोखले आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
