
मुंबईतील वरिष्ठ महिला पत्रकार नितिका राव यांच्यावर सरकारला प्रश्न विचारल्याने प्राणघातक हल्ला झाल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम आम्ही फेसबुक, लिंक्डइन आणि ट्विटरवर पत्रकार नितिका राव यांच्याबद्दल काही मिळते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला त्यांच्याबद्दल कोणतीच माहिती आढळून आली नाही. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर आम्ही याबाबत काही माहिती मिळते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला याबाबत कोणतीही माहिती आढळून आली नाही. त्यानंतर आम्ही मराठीत नितिका राव असे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला 23 नोव्हेंबर 2017 रोजीची Bihar News Express.Suresh Gupta या पेजवरील एक पोस्ट दिसून आली. या पोस्टमध्ये नितिका राव यांना अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष घोषित करण्यात आल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर आम्ही मुंबईत नितिका राव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कोणी निषेध केला आहे, याचा शोध घेतला असता आम्हाला Abdul Mahfooz Khan यांच्या अकाउंटवर या हल्ल्याचा निषेध करण्यात आल्याचे दिसून आले.
या अकाऊंटवर आम्हाला नितिका राव यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करणाऱ्या अनेक पोस्ट दिसून आल्या. 8 जून 2019 च्या एका पोस्टमध्ये त्यांच्यावरील हल्ल्याचे कारण बिल्डर का अवैध बिल्डिंग का कार्य रोकवाना असल्याचे म्हटले आहे.
बूम या संकेतस्थळाने नितिका राव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण सरकारला प्रश्न विचारला म्हणून आपल्यावर हल्ला झाल्याचे नाकारले आहे.
निष्कर्ष
मुंबईतील वरिष्ठ महिला पत्रकार नितिका राव यांच्यावर सरकारला प्रश्न विचारल्याने हल्ला झालेला नाही. एका बिल्डरच्या अवैध कामाला विरोध केल्याने त्यांच्यावर हल्ला झाल्याचे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीने म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : सरकारला प्रश्न विचारल्याने पत्रकार नितिका राव यांच्यावर हल्ला झाला का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
