
नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरियाणा येथील शेतकरी आक्रमक झाले असून, मोठ्या संख्येने शेतकरी ‘चलो दिल्ली’चा नारा देत आंदोलनासाठी राजधानीत येत आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू न देण्यासठी प्रशासनाने पोलिस व इतर सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या.
दरम्यान, तणाव वाढल्यामुळे पोलिसांना आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात आला. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो म्हणून काही छायाचित्रे पसरविली जात आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, हे फोटो 2018 साली झालेल्या आंदोलनाचे आहेत.
दावा क्र. 1

मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
सत्य: हा फोटो 2018 मधील आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान यूनियनतर्फे ‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानुसार शेतकरी दिल्लीकडे निघाले होते. ‘झी-24 तास’च्या बातमीनुसार, हरिद्वारपासून दिल्लीत येतांना शेतकऱ्यांना दिल्लीत परवानगी मिळाली नव्हती. तरीही शेतकऱ्यांनी 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीत प्रवेश केल्याने त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आहे.

मूळ लिंक – डेक्कन हेराल्ड
कर्जमाफी आणि वीज दरांसंबंधीच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. गांधी जयंतीच्या दिवशी शेतकरी राजघाट ते संसद भवन अशी पदयात्रा काढणार होते. परंतु, पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. ANI वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ शेयर केला होता. आंदोलकांनी बॅरिगेट्स तोडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला होता.
दावा क्र. 2

मूळ पोस्ट – फेसबुक | अर्काइव्ह
सत्य: हा फोटोसुद्धा वर उल्लेख केलेल्या ‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलनाचा म्हणजेच 2 ऑक्टोबर 2018 रोजीचा आहे. ट्रॅक्टर व ट्रक घेऊन हजारोंच्य संख्येने शेतकरी दिल्लीत आले होते. परंतु, पोलिसांना त्यांना सीमेवरच अडविले होते. ही घटना दिल्ली-यूपी बॉर्डरवरील आहे.

मूळ लिंक – फर्स्टपोस्ट
दावा क्र. 3

मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
सत्य: हा फोटोसुद्धा 2 ऑक्टोबर 2018 रोजीच्या आंदोलनाचा आहे. तो सध्या सुरू असलेल्या किसान आंदोलनाचा नाही.

मूळ लिंक – डेली-ओ
वर दिलेले फोटो जरी जुने असले तरी हेदेखील सत्य आहे की, सध्या दिल्लीकडे जात असलेल्या आंदोलकांवर काल पोलिसांनी कुरुक्षेत्र येथे पाण्याचा मारा केला. त्याचा खरा व्हिडिओ खाली पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, दोन वर्षांपूर्वीचे फोटो सध्या सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचे म्हणून शेयर केले जात आहेत. विशेष म्हणजे, दिल्ली पोलिसांनी 27 नोव्हेंबर रोजी आंदोलकांना प्रदर्शन करण्याची परवागनी दिली आहे.

Title:दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नावे जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Partly False
