
सहारनपूर येथील देवबंद दारुल उलूमचा एक फतवा सध्या समाजमाध्यमात फिरत आहे. मौलाना गयूर शेख यांच्या नावाने हा फतवा फिरत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा स्वरुपाचा हा फतवा आहे. मोहन माळी यांनी असल्या प्रवृत्तीना मुळा सकट ठेचण देशहिताच आहे ,अश्या लोकामुळे सामाजिक भाईचारा धोक्यात आला आहे ,हे देशास घातक ठरेल ,जातीचा अभिमान असावा पण द्वेश इतका कडवड असतो ,विचार करायला लावणारा आहे . अशी माहिती देत हा फतवा पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फतव्याच्या सत्यतेची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
देवबंद दारुल उलूमने खरोखरच असा काही फतवा जारी केला आहे का, याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी अमर उजाला या हिंदी संकेतस्थळाने 2 मार्च 2020 रोजी प्रकाशित केलेले एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात दारुल उलूमने हा फतवा खोटा असून त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे दिसून आले. पत्रिका या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिलेले आहे.
अमर उजालाचे मुळ वृत्त / Archive
त्यानंतर झी सलाम या वृत्तवाहिनीने 4 मार्च 2014 रोजी दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार दारुल उलूम देवबंदने सहारनपुरचे एसएसपी दिनेश कुमार पी. यांची भेट घेत कारवाईची मागणी केल्याचे म्हटले आहे. एसएसपी दिनेश कुमार पी. यांनी याप्रकरणात लक्ष घालत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.
झी सलामचे सविस्तर वृत्त / Archive
नवभारत टाईम्सनेही याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. दैनिक भास्करने याबाबतचे वृत्त देताना पोलीस याप्रकरणी एका युवकाचा शोध घेत असल्याचे म्हटले आहे.
दैनिक भास्करचे मुळ वृत्त / Archive
दारुल उलूमचे देवबंद उलेमा कारी इसहाक गोरा यांनी संस्थेने याचे खंडन केल्याचे सांगितले. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीतील तथ्य जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तर एसएसपी दिनेश कुमार यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे.
देवबंद पोलिसांच्या एसएचओशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी देवबंद दारुल उलूमने हा फतवा आपला नसल्याचे अधिकृतरित्या पोलिसांना कळवले असल्याचे सांगितले. हा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
निष्कर्ष
देवबंद दारुल उलूमने हा फतवा असत्य असल्याचे अधिकृतरित्या पोलिसांना कळवले आहे.
