
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास मी आणि शबाना देश सोडेल, असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
जावेद अख्तर यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास मी आणि शबाना देश सोडेल, असे वक्तव्य केले आहे का? याचा आम्ही शोध घेतला. त्यावेळी आम्हाला अख्तर यांचे एक वक्तव्य दिसून आले. या वक्तव्यात त्यांनी आपल्याला मोदी पंतप्रधान म्हणून आवडत नाहीत पण मी राहुल गांधींना या पदावर पाहू इच्छित नाही, असे वक्तव्य केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेले हे वृत्त तुम्ही लिंकवर क्लिक करुन पाहू शकता.
त्यानंतर आम्ही जावेद अख्तर यांनी शबाना आझमी यांच्याबद्दल काय वक्तव्य केले आहे का? हे त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर तपासले. त्यावेळी आम्हाला त्यांचे खालील ट्विट दिसून आले.
शबाना आझमी यांनी असे काही म्हटले का याचीही आम्ही पडताळणी केली. तेव्हा अशी कोणतीही बातमी आढळली नाही. उलट त्यांच्या नावे खोटे विधान पसरविल्याच्या बातम्या समोर आल्या.
महाराष्ट्र टाईम्सने 11 मे रोजी दिलेल्या बातमीमध्ये शबाना आझमी यांनी भारत सोडून जाण्याविषयी विधान केले नसल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, मी देश सोडणार असल्याची चर्चा निव्वळ अफवा आहे. फेक न्यूज ब्रिगेडची परिस्थिती दयनीय आहे. एखाद्या मुद्यावर चर्चा न करता, अशी खोटी बनावट माहिती पसवण्याचा उद्योग यांनी पुन्हा सुरू केलाय आणि देशातील जनताही अशा माहितीवर विश्वास ठेवते.
सविस्तर बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स
निष्कर्ष
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मी आणि शबाना देश सोडून जाईल, असे वक्तव्य सुप्रसिद्ध गीतकार व पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी केले असल्याचे कुठेही आढळून येत नाही. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : जावेद अख्तर म्हणाले का, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास देश सोडेल?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
