
आंबोली घाटातील हे अंगाचा थरकाप उडवणारे भयावह दृष्य तरी मित्रांनो पावसाळ्यात शक्यतो प्रवास टाळा, अशी माहिती Rajendra Dikundwar यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
आंबोली घाटात खरंच अशी घटना घडली आहे का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा असे कोणतेही वृत्त आम्हाला दिसून आले नाही. त्यामुळे आम्ही या व्हिडिओतील काही दृश्ये घेत ती रिव्हर्स इमेज सर्च केली. त्यावेळी आम्हाला 18 ऑगस्ट 2017 रोजीचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात म्हटले आहे की, बिहारमधील पुराचं पाणी अररिया बहादुरगंज रस्त्यावर आल्यानं पूल कोसळला. या घटनेत तीन जण वाहून गेले आहेत.
केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्यावेळी बिहारमधील या घटनेची दखल घेतली होती. मेट्रो या ब्रिटनमधील संकेतस्थळाने 18 ऑगस्ट 2017 रोजी दिलेले वृत्त आपण खाली पाहू शकता.
न्यूयॉर्क पोस्टनेही या घटनेबाबतचे वृत्त दिले आहे. झी न्यूज या वृत्तवाहिनीने या घटनेचे वृत्त देताना हा व्हिडिओ बनविणाऱ्या मोहम्मद सलमान यांची मुलाखतही घेतली आहे. या मुलाखतीत त्यांनी ही सकाळी नऊ वाजताची घटना असल्याचे सांगितले. आपण या व्यक्तींना पुल ओलांडू नका, असे सांगितले मात्र त्यांनी ऐकले नाही. या वाहून गेलेल्या व्यक्तींचे मृतदेह सापडल्याचेही त्याने स्पष्ट केले. रुखसाना नावाच्या महिलेने सांगितले की, या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये माझी बहीण जेहनूर, माझा मुलगा रहमान आणि बहिणीचा मुलगा ताहीर यांचा समावेश आहे. आपण हे सविस्तर वृत्त खाली पाहू शकता.
निष्कर्ष
आंबोली घाटात अशी कोणतीही घटना घडलेली नाही. ही घटना बिहारमधील अरेरिया येथे ऑगस्ट 2017 मध्ये म्हणजेच जवळपास 2 वर्षापुर्वी घडलेली आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:FACT CHECK : बिहारमधील जुनी घटना आंबोली घाटातील म्हणून व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
