राहुल गांधीच्या पराभवानंतर अमेठीतील लोक खरंच रडले का? काय आहे त्या व्हिडियोचे सत्य?

False राजकीय | Political

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती ईराणी यांनी पराभव केला. तब्बल चाळीस वर्षांनंतर अमेठीची जागा काँग्रेसच्या ताब्यातून गेली. पराभवाचा हा धक्का तेथील काँग्रेस समर्थकांना सहन झाला नाही. सोशल मीडियावर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, अमेठीतील काही लोक दिल्लीत येऊन राहुल गांधींपाशी ढसाढसा रडले. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची सत्य पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये 20 सेंकदाची एक क्लिप शेयर केलेली आहे. त्यामध्ये काही लोक राहुल गांधी यांना बिलगुन रडताना दिसतात. राहुल त्यांना धीर देत आहेत. एक भावनिक हिंदी गाणे पार्श्वसंगीत म्हणून वापरण्यात आले आहे. पोस्टमध्ये लिहिले की, अमेठीहून दिल्लीला आलेल्या लोकांना जेव्हा राहुल गांधी भेटले तेव्हा त्यांना पाहुन लोक भावूक झाले. त्यांना ढसाढसा रडू कोसळले. कट-कारस्थान आणि फसवणुकीच्या विचारधारेमुळे राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले आहेत. पण लोकांचे त्यांच्याविषयी प्रेम आणि जिव्हाळा अजून कमी झालेला नाही.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम या व्हिडियोतील एक फ्रेम निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून राहुल गांधी यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरील एक व्हिडियो समोर आला. तो तुम्ही खाली पाहू शकता. 2 नोव्हेंबर 2017 रोजी शेयर केलेल्या या व्हिडियोमध्ये लिहिलेले आहे की, श्रमिकों की मांग है कि लापरवाही की वजह से हुई इस दुर्घटना की न्यायिक जांच होनी चाहिए और दोषियों को कड़ी सजा मिलनी चाहिए। म्हणजे हा व्हिडियो दीड वर्षांपूर्वीचा आहे. लोकसभेचा निकाल 23 मे रोजी लागला.

या व्हिडियोविषयी अधिक तपास केला असता कळाले की, रायबरेली येथील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात 1 नोव्हेंबर 2017 रोजी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला. रायबरेली हा गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच राहुल गांधी यांनी रायबरेलीला भेट दिली होती. हा व्हिडियो या भेटी दरम्यानचा आहे.

दैनिक जागरणने या भेटीची बातमी केली होती. त्यानुसार, राहुल गांधी यांनी रायबरेली येथील शवविच्छेदनगृहाला भेट दिली होती. तेथे पीडितांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. पीडितांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे मदत मिळवून देण्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. तसेच, या घटनेचा तपास करण्याचीही मागणी केली होती.

मूळ बातमी येथे वाचा – जागरणअर्काइव्ह

या घटनेचा व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

निष्कर्ष

पोस्टमधील व्हिडियो दीड वर्षांपूर्वीच्या एनटीपीसी बॉयलर स्फोटातील पीडितांच्या कुटुंबियांना राहुल गांधींनी दिलेल्या भेटीचा आहे. त्यामुळे पराभवानंतर अमेठीतील लोक राहुल गांधी यांच्यापाशी रडत असल्याचा दावा खोटा आहे.

Avatar

Title:राहुल गांधीच्या पराभवानंतर अमेठीतील लोक खरंच रडले का? काय आहे त्या व्हिडियोचे सत्य?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False