
सोशल मीडियावर एक मेसेज येतो आणि सगळीकडे हाहाकार माजतो. पंजाब-महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी) निर्बंध लादल्याचे प्रकरण ताजे असतानाच इतर बँकांवरसुद्धा आरबीआयची कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (25 सप्टेंबर) एक मेसेज व्हायरल झाला की, सार्वजनिक क्षेत्रातील 9 बँका कायमस्वरुपी बंद करण्याचा आरबीआयने निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरात लवकर खातेदारांनी या बँकांमधून पैसे काढून घेण्याचा आवाहन या मेसेजमध्ये करण्यात आले. अनेकांनी फॅक्ट क्रेसेंडो मराठीकडे या मेसेजची सत्य पडताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक
काय आहे मेसेजमध्ये?
सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये म्हटले की, भारतीय रिझर्व्ह बँकतर्फे नऊ बँका कायमस्वरूपी बंद केली जाणार आहेत. यामध्ये कॉर्पोरेशन बँक, यूको बँक, आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल, बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांची नावे आहेत. जर या बँकांमध्ये काही व्यवहार असतील तर कृपया ते परत घ्या. या बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर कृपया ताबडतोब सुरक्षित करा आणि हा मेसेज सर्वांना पाठवा. सुप्रीम कोर्टाने तसा आदेश दिला आहे.
तथ्य पडताळणी
सार्वजनिक क्षेत्रातील नऊ बँका बंद होणार असे खरे मानले तर यासंबंधी नक्कीच बातम्या आल्या असणार. त्याप्रमाणे शोध घेतल्यावर महाराष्ट्र टाईम्सची एक बातमी आढळली. त्यानुसार, आरबीआयच्या नावे नऊ बँका बंद करण्याचा मेसेज खोटा आहे. बातमीत म्हटले की, सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या अफवा असल्याचे आरबीआयने खुलासा केला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – महाराष्ट्र टाईम्स
बँका बंद होणार असल्याचा मेसेज एवढा पसरला की, आरबीय आणि अर्थसचिव यांना तो खोटा असल्याचा खुलासा करावा लागला. अर्थ सचिव राजीव कुमार यांनी ट्विट केले की, बँका बंद होणार अशी अफवा मेसेजद्वारे सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहे. हा मेसेज खोटा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बळकटी देण्याचे काम सरकार करत आहे. म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद करण्याचा प्रश्नच येत नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत, असे आरबीआयने ट्विट करून सांगितले. ते ट्विट तुम्ही खाली वाचू शकता. “सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेज चुकीचे आहेत. बँका बंद होणार नाहीत”, असे आरबीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे.
निष्कर्ष
यावरून हे स्पष्ट होते की, आरबीआयकडून सार्वजनिक क्षेत्रातील 9 बँका बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. असा दावा करणारा मेसेज खोटा आहे. आरबीआय आणि अर्थसचिव यांनी तसा खुसाला केला आहे. म्हणून अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि ही खरी माहिती आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहचवा.

Title:सार्वजनिक क्षेत्रातील 9 बँका बंद करण्याचा मेसेज खोटा. “पैसे” काढण्यापूर्वी वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
