
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी त्यांचे ज्येष्ठ सहकारी लालकृष्ण अडवाणी यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी त्यांचे ज्येष्ठ सहकारी लालकृष्ण अडवाणी यांना लिहिलेल्या या पत्रावर एएनआयचा वॉटर मार्क दिसत आहे. त्यामुळे आम्ही एएनआयच्या संकेतस्थळावर जाऊन हे पत्र आहे का हे पाहिले. तिथे आम्हाला असे पत्र आढळून आले नाही. त्यानंतर एएनआयच्या ट्विटर अकाऊंटवर गेलो असता आम्हाला हे ट्विट दिसून आले.
दैनिक सामनाने आपल्या वृत्तात मुरली मनोहर जोशी यांनी अडवानी यांना पत्र लिहिलेले नाही. जोशी यांच्या कार्यालयातून हे स्पष्ट करण्यात आले आहे, असे म्हटले आहे.

मुरली मनोहर जोशी यांनी याबाबत एक पत्र मुख्य निवडणूक आयोग यांना लिहिले आहे. हे बनावट पत्र आपल्या नावावर कोणी लिहिले याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुरली मनोहर जोशी यांचे स्वीय सहाय्यक राजीव बेलवाल यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यांनीही मुरली मनोहर जोशी यांनी असे कोणतेही पत्र लिहिल्याचा इन्कार केला आहे. मुरली मनोहर जोशी यांनी असे पत्र लिहिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निष्कर्ष
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी त्यांचे ज्येष्ठ सहकारी लालकृष्ण अडवाणी यांना लिहिलेले पत्र बनावट असल्याचे दिसून येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. दैनिक सामनानेही याबाबतचे वृत्त देताना जोशी यांच्या कार्यालयातून हे पत्र अडवानी यांनी लिहिलेले नाही, असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:सत्य पडताळणी : मुरली मनोहर जोशींनी लिहिले अडवाणींना व्यथा मांडणारे पत्र?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
