
देश के नंबर वन PM अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये शीखविरोधी दंगलीत हजारो निर्दोषांची हत्या घडवून आणली, बोफोर्स घोटाळा करुन देशाचे कोट्यावधी पैसे खाल्ले, एक रुपयातील केवळ 15 पैसे जनतेला देत होते, भोपाळ वायू दुर्घटनेतील आरोपीला देशाबाहेर पळवून लावले असे आरोप माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधींवर करण्यात आले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

तथ्य पडताळणी
बोफोर्स घोटाळा करुन देशाचे कोट्यावधी पैसे खाल्ले, एक रुपयातील केवळ 15 पैसे जनतेला देत होते, भोपाळ वायू दुर्घटनेतील आरोपीला देशाबाहेर पळवून लावले, शीखविरोधी दंगलीत हजारो निर्दोषांची हत्या घडवून आणली, बोफोर्स असे विविध आरोप माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर या पोस्टमध्ये करण्यात आले आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने यातील शीखविरोधी दंगलीत हजारो निर्दोषांची हत्या घडवून आणली या आरोपाबाबत शोध घेतला असता आम्हाला बीबीसी मराठीचे खालील वृत्त दिसून आले. जेव्हा मोठी झाडे पडतात तेव्हा धरणी हादरतेच, असे वक्तव्य राजीव गांधींनी केले होते, असे या वृत्तात म्हटले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नानावटी आयोगाचा एक अहवालही आम्हाला यासंदर्भात दिसून आला. यात राजीव गांधी यांचा या दंगलीत कोणतीही भूमिका असल्याचे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले आहे. राजीव गांधी यांनी त्यावेळी होत असलेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केल्याचे आयोगाने म्हटले आहे. आपण अहवाल सविस्तरपणे खालील लिंकवर वाचू शकता.

बोफोर्स घोटाळा करुन देशाचे कोट्यावधी पैसे खाल्ले असा दावा पोस्टकर्त्याने केला आहे. याविषयी शोध असताना आम्हाला दैनिक लोकसत्ताचे संपादकीय दिसून आले. यात स्पष्टपणे राजीव गांधी यांची सुमारे पाव शतकांच्या चारित्र्यहननानंतर लाचखोरी आरोपीतून सुटका झाल्याचे म्हटले आहे.
राजीव गांधी हे एक रुपयातील केवळ 15 पैसे जनतेला देत होते, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याबाबत शोध घेत असताना आम्हाला याबाबत हिंदूस्थान टाईम्सने दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तात ओडिशातील कालाहांडी या ठिकाणी एका संबोधित करताना राजीव गांधी म्हणाले होते की, एखाद्या सरकारी योजनेत एक रुपया खर्च केल्यास त्यातील केवळ 15 पैसे जनतेपर्यंत पोहचतात. त्यामुळे ते एक रुपयातील केवळ 15 पैसे जनतेला द्यायचे असे म्हणता येत नाही. त्यांनी सरकारी यंत्रणेतील भ्रष्ट्राचाराचे उदाहरण म्हणून ही बाब सांगितली होती.

भोपाळ वायू दुर्घटनेतील आरोपीला देशाबाहेर पळवून लावले असा आरोप माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधींवर या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. याविषयावर पी. सी. अलेक्झांडर यांनी भोपाळ वायूगळती दुर्घटनेला जबाबदार युनियन कार्बाईड कंपनीचे तत्कालीन प्रमुख वॉरन अँडरसन यांना पळून जाण्यासाठी मदत करण्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचाही सहभाग असू शकतो, असे विधान केले होते. या प्रकरणात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा दूरान्वयानेही संबंध नाही, असे जयंती नटराजन यांनी म्हटले होते. याबाबतचे वृत्त दैनिक महाराष्ट्र टाईम्सने 12 जून 2010 रोजी दिले होते.

निष्कर्ष
नानावटी आयोगाने शीखविरोधी दंगलीत राजीव गांधीची कोणतीही भूमिका असल्याचे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले आहे. बोफोर्स प्रकरणातून राजीव गांधींची सूटका झाल्याचेही दिसून येत आहे. राजीव गांधी हे एक रुपयातील केवळ 15 पैसे जनतेला देत होते, असे म्हणता येत नाही. त्यांनी केवळ सरकारने खर्च केलेल्या एक रुपयापैकी केवळ 15 पैसे जनतेपर्यंत पोहचतात, असे म्हटले होते. वॉरन अँडरसन याच्या पळून जाण्याशी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा दूरान्वयानेही संबंध नाही, असे जयंती नटराजन यांनी म्हटले होते. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य असल्याचे सिध्द होत आहे.
