
मावळकर विसरला नाहीत ना? ज्या #अजित #पवारांनी शेतकर्यांवर गोळीबाराचे आदेश दिल्यानंतर 4 शेतकऱ्यांना आपले #प्राणगमवावे लागले. अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
मावळ गोळीबारप्रकरणी न्या. एम. जी. गायकवाड यांच्या चौकशी समितीने आपला अहवाल 2014 मध्ये पावसाळी अधिवेशनात सादर केला होता. या अहवालात गोळीबारासाठी पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक त्यांच्या सहकाऱ्यांना दोषी धरले मात्र तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे आदेश दिल्याचे कुठेही म्हटलेले नाही. दैनिक दिव्य मराठीने 17 जून 2014 रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे.

माझा पेपर या संकेतस्थळाने 24 एप्रिल 2015 रोजी मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांना क्लिन चीट अशा शीर्षकाचे वृत्त दिले आहे. या वृत्तात राज्य सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा दाखला देण्यात आला आहे. मुळात कर्णिक यांनी जमावाला आटोक्यात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला होता व यासाठी रबराच्या गोळ्यांचा वापर केला होता. तरीही कर्णिक यांना समज दिल्याचे प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले आहे. तर पोलीस अधिकारी अशोक पाटील, यशवंत गवारी व गणेश माने यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचेही शासनाने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोळीबाराचे आदेश दिल्याचे या प्रतिज्ञापत्रात कुठेही म्हटलेले नाही.

झी 24 तास या वृत्तवाहिनीने 15 मार्च 2012 रोजी मावळ गोळीबार… आदेश नसतानाही गोळीबार? या शीर्षकाने एक वृत्त दिले आहे. या वृत्ताच्या शीर्षकातच आदेश नसतानाही गोळीबार करण्यात आला का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

झी 24 तासने 17 मे 2012 रोजी एक वृत्त दिले आहे. या वृत्तात तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी मावळमध्ये गोळीबाराचे आदेश मी पोलिसांना दिले नव्हते, तर पोलीस अधिका-यांनीच परिस्थितीनुसार गोळीबाराचा निर्णय घेतला असे म्हटले आहे. या वृत्तात कुठेही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोळीबाराचा आदेश दिले होते, असे म्हटलेले नाही.

निष्कर्ष
मावळ येथे झालेल्या गोळीबाराचा आदेश तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे, न्यायालयात देण्यात आलेल्या साक्षी आणि सरकारचे प्रतिज्ञापत्र आणि त्याबाबत माध्यमांनी केलेले वृत्तांकन असे कुठेही आढळून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळून येत आहे.

Title:सत्य पडताळणी : मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबाराचे आदेश अजित पवारांनी दिले होते का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
