
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडिओ शेअर करीत दावा केला जात आहे की, त्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात वक्तव्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
“पंतप्रधानांना शेतकऱ्यांची परिस्थिती माहिती असूनसुद्धा त्यांनी विचारणा नाही केली,” असे ते या व्हिडिओत म्हणतात.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ आठ वर्षे जुना असून चुकीच्या माहितीसह पसरवला जात आहे.
काय आहे दावा?
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये राजनाथ सिंह म्हणतात की, “जर शेतकरी एकजुट होऊन रस्त्यावर उतरले तर, त्यांच्या धीटपणाला तोडगा नाही आहे. पंतप्रधानांना त्यांची परिस्थिती माहित असूनही त्यांनी विचारणा केली नाही.”
या व्हिडिओवरून दावा केला जात आहे की, राजनाथसिंह यांनी मोदींवर टीका करीत शेतकऱ्यांना समर्थन दिले.
तथ्य पडताळणी
हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याचा शोध घेतला. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर 20 मार्च 2013 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ आढळला.
महागाई, ढासळते उत्पन्न व किमान आधारभूत मूल्य, अशा आव्हानांनी ग्रासलेले शेतकरी त्यावेळी जंतरमंतर येथे आंदोलन करीत होते. त्यांना समर्थन देण्यासाठी राजनाथ सिंह तेथे गेले होते.
2013 साली मनमोहन सिंह पंतप्रधान होते. शेतकऱ्यांना कमीत कमी उत्पन्नाची हामी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी 2011 साली पंतप्रधानांकडे मागणी केली होती. त्याचा काहीही परीणाम न झाल्याने त्यांनी मार्च 2013 मध्ये आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाची बातमी द हिंदू या वृत्तपत्राने 19 मार्च 2013 साली प्रकाशित केली होती.

निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, या व्हिडिओमध्ये राजनाथ सिंह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी बोलत आहे. हा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह शेअर केला जात आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली नाही.

Title:राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत शेतकऱ्यांना समर्थन दिले का? वाचा सत्य
Fact Check By: Milina PatilResult: False
