
भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये गलवान खोऱ्यात रक्तरंजीत संघर्ष झाला. त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले तर, चीनचेसुद्धा सैनिक मारले गेले. अशा परिस्थितही भारतीय लष्कराने न डगमगता केवळ 72 तासांत गलवान खोऱ्यातील नदीवर 60 मीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले.
ही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करताना अनेक युजर्सने गलवान नदीवरील या लष्करी पुलाचे म्हणून काही फोटो शेयर केलेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याविषयी पडताळणी करण्याची विनंती केली.
पडताळणीत समोर आले की, गलवान नदीवर लष्कारने पुल बांधला हे खरे आहे; परंतु सोशल मीडियावरील फोटो जुने आहेत.
काय आहे पोस्टमध्ये?
“कडाक्याच्या थंडीत ७२ तासात लष्कराच्या इंजिनिअर्सनी गलवान नदीवर उभा केला पूल” अशा कॅप्शनसह एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049043487) वाचकांनी हा मेसेज आणि फोटो पाठवले.

हाच मेसेज आणि फोटो फेसबुकवरदेखील शेयर होत आहे. त्यात म्हटले की, गलवान खोऱ्यात 15 जूनच्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तिथे अत्यंत तणावाची स्थिती होती. मात्र त्या परिस्थितीतही भारतीय लष्कराने रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सना गलवान नदीवर अत्यंत वेगाने पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम मेसेजमधील माहितीचा गुगलवर शोध घेतला असता कळाले की, पोस्टमध्ये असलेला संपूर्ण मजकूर लोकसत्ताच्या बातमीतून जशास तसा कॉपी केलेला आहे. लोकसत्ताच्या 20 जून रोजीच्या बातमीचे शीर्षकसुद्धा तेच आहे – “करुन दाखवलं! कडाक्याच्या थंडीत ७२ तासात लष्कराच्या इंजिनिअर्सनी गलवान नदीवर उभा केला पूल”

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ता । अर्काइव्ह
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, 16 जून सकाळी भारतीय लष्कराच्या अभियंत्यांनी पूल उभारणीचे काम सुरू केले. भारतीय लष्कराच्या कारू येथील माउंटेन डिव्हिजनने गलवान नदीवरील पुलाचं बांधकाम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. या नंतर गलवान नदीवर पूल उभारणीचे काम प्रचंड वेगाने सुरू झाले. आणि ज्या ठिकाणी संघर्ष झाला तिथून काही किलोमीटर अंतरावरच हा पूल उभारण्यात येत होता.
थोडक्यात काय तर लष्कराने गलवान नदीवर अत्यंत जलदगतीने पूल बांधला हे खरं आहे.
मग फोटोचे काय?
पोस्टमधील फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आढळले की, हा फोटो 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. टाईम्स ऑफ इंडियाने 20 सप्टेंबर 2018 रोजी दिलेल्या बातमीत तो वापरण्यात आला आहे. लष्कराने जम्मू व काश्मीरमधील रजौरी येथे शाळकरी मुलांना शाळेत जाता यावी म्हणून एका फुटब्रीज बांधला होता. या बातमी प्रातिनिधिक छायाचित्र म्हणून हा फोटो वापरण्यात आलेल्या आहे.

मूळ बातमी येथे वाचा – टाईम्स ऑफ इंडिया । अर्काइव्ह
सैनिक पुलाचे काम करतानाचा दुसरा फोटोदेखील गलवान नदीवरील नाही. गेटी इमेजेस या जागतिक फोटोसंस्थेने हा फोटो प्रसिद्ध केला होता. त्यातील माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेजवळ उरी येथे 11 फेब्रुवारी 2016 रोजी कमान ब्रीज बांधतेवेळीचा हा फोटो आहे.
Embed from Getty Imagesमूळ फोटो येथे पाहा – गेटी इमेजेस
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, लष्कारने गलवान खोऱ्यात विक्रमी वेळेत पूल बांधला हे खरं आहे. परंतु, सोशल मीडियावर गलवान खोऱ्यातील पुलाचे म्हणून जे फोटो शेयर होते आहेत ते जुने आहेत.

Title:लष्काराने गलवान खोऱ्यात 72 तासांत बांधलेल्या पुलाचे हे फोटो नाहीत. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
